मुंबई : महानगरपालिकेकडे पुलांची संख्या आणि नावांची अधिकृत माहिती नसल्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट रखडलं आहे. त्यामुळे तब्बल 274 पूल रामभरोसेच आहेत.


महाडमधील सावित्री नदीवरच्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईतल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला घेतलं होतं. ऑडिटसाठी तीन सल्लागार कंपन्याही नियुक्त करण्यात आल्या होत्या. या ऑडिटचा रिपोर्ट सहा महिन्यांत येणं अपेक्षित होतं.

पण दोन वर्ष उलटल्यानंतरही या पुलांच्या नावाची यादी तयार करण्याचंच काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळे पुलांचं ऑडिट झालेलं नाही. त्यामुळे या पुलांची डागडुजी करण्याचं काम रखडलं आहे.

अंधेरी दुर्घटनेनंतर जाग

दरम्यान,अंधेरी येथील पुल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि महानगरपालिकेला जाग आल्याचं दिसत आहे. उद्यापासून रेल्वे हद्दीतल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु होणार आहे. महापालिका आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी,एफओबी, स्काय-वॉक इत्यादी प्रकारचे 445 पूल आहेत.या पुलांची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) उद्यापासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी एकूण 12 टीम गठीत करण्यात आल्या आहेत. या टीम्समध्ये आयआयटी मुंबईमधील तज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंते व महापालिकेच्याही तज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे.

अंधेरी येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला.