वसई : विरार पूर्वेकडील कारगिलनगर येथील तीन ते चार चाळींवर रात्री अपरात्री दगडांचा वर्षाव होत आहे. यामुळे येथील दोनशेच्या वर कुटुंब हे सध्या दहशतीखाली आहेत. ही कुटुंबं आपल्या लहानग्यांसह आपला जीव मुठीत घेऊन  राहत आहेत.  चाळीतले रहिवाशी इतके भयभीत झाले आहेत की रात्रभर जागता पहारा ते देत आहेत.


विरार पूर्वेकडील कारगिल नगर परिसरातील या चाळींमध्ये दोनशे मध्यमवर्गीय कुटुंबं राहतात. रोजच्या भाकरीच्या लढाईसाठी तारेवरची कसरत करत असताना, आता त्यांना नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.  कारगिलनगर रोडवर जय जीवदानी संकुल, ओम नमःशिवाय, साई प्रतिक्षा या नावाने चाळी आहेत.  मागच्या महिनाभरापासून यांच्या चाळीतील घरावर रात्री- बेरात्री दगडाचा वर्षाव होत आहे.

अनेकांच्या घरांवर दगड पडल्याने त्याचे पत्रे तुटून दगड घरात पडले आहेत, पत्र्यांना मोठं मोठे होल पडले आहेत. स्वत:च्या बचावासाठी काही जणांनी चिकटपट्टी त्या तुटलेल्या पत्र्यांना लावली आहे. तर काहींनी जुन्या साड्या, चादरी पत्र्याखाली लावल्या आहेत. सतत पडणाऱ्या या दगडांमुळे या ठिकाणांचे रहिवाशी दहशतीच्या सावटाखाली आहेत. यामुळे मुंबईमध्ये काम करून रात्री घरी आल्यानंतर येथील रहिवांशाना रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत जागता पहारा द्यावा लागत आहे. रात्री अकराच्या नंतर कुणीतरी अज्ञात या रहिवाशांच्या घराव दगडांचा वर्षाव करत आहे.

घरांवर पडणारे दगड मोठे असल्याने पत्रा फोडून आत पडतात.  येथील रहिवाशांनी स्थानिक विरार पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे, पण पोलीसांकडून मात्र अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.