राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत शपथविधी
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2019 01:58 PM (IST)
रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेत नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संभाव्य मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर पोहचण्याचा निरोप देण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त लाभला आहे. रविवार, 16 जून रोजी सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्येला जाणार असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच हा शपथविधी होण्याची चिन्हं आहेत. उपमुख्यमंत्रिपदावर पाणी दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ही माहिती मिळाली. उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली. तसेच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं होतं. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत होते, तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांच्या निवडीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा सुरु होती.