मुंबई : मालाडमध्ये मनसे आणि फेरीवाल्यामध्ये झालेल्या मारहाणीचं लोण आता दादरपर्यंत पसरलं आहे. कारण मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लक्ष्य केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली आहे.


मनसेनं फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपमांनी उडी घेतल्यानंतर आता हे प्रकरण चांगलच चिघळलं आहे. संजय निरुपमा यांनी चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

मुंबईच्या मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेआधी मालाडमध्ये झालेल्या सभेत संजय निरूपम फेरीवाल्यांना कायदा हातात घेण्यासाठी उसकावलं. त्यानंतर ही घटना घडली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

मालाडचे मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे आज (शनिवार) दुपारी 3.30च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावानं माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला.

यावेळी माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला