मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण, वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी  मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला आहे.  


थकित वेतन, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी आगार बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पडळकर यांनी म्हटले की,  येत्या 10 नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह मंत्रालयाच्या प्रांगणात एकत्र यावे. त्या ठिकाणी उघड्यावर संसार मांडू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. 


195 आगारातून वाहतूक सुरू


एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरू आहे. राज्यातील 250 पैकी 55 आगार बंद असून 195 आगारातून वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेवराई आगारातील कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले. 


...तर एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका; राज ठाकरे यांचा इशारा


वेतन व इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील काही ठिकाणचे एसटी आगार बंद आहेत. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. या संपकरी, आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यास त्यांच्यातील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा पत्रातून दिला आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.