मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी (5 एप्रिल) मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.  राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मिशन ब्रेक द चेन, अनिल देशमुख राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केलं.


दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सूचनांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून. सूचना योग्य असून मंत्रिमंडळाशी चर्चा करुन उपाययोजना करु, असं त्यांनी म्हटलं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.


राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना


उत्पादन : छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली.


बँक : लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत. नियमावली ३० एप्रिलपर्यंत आहे तोपर्यंत 


वीज बिल माफ करणे : व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं


कंत्राटी कामगार : अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.


मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी. 


क्रीडा क्षेत्र : सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.


शेतकरी : राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.


शाळा : शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा. 


अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता : राज ठाकरे
सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. तर कोणाच्या सांगण्यावरुन मुकेश अंबानींच्या घरासमोर पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली हा मूळ विषय. त्याची चौकशी होणार आहे का? कोणीतरी सांगितल्याशिवाय पोलीस असं कृत्य करणार नाही. चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी."


बदलीनंतर परमबीर सिंहांना 100 कोटींचा साक्षात्कार? राज ठाकरेंचा सवाल
अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याविषयी राज ठाकरे म्हणाले की, "परमबीर सिंह यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच."