मुंबई : मंत्रालयातील मारहाण प्रकरणाची सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दखल घेतली असून, बडोलेंनी पीएला हटवलं आहे. उस्मानाबादमधील शिक्षण संस्थाचालक अरुण निटुरे यांनी पीएला मंत्रालायात जाऊन मारहाण केली होती.


बडोलेंनी काय कारवाई केली?

मंत्रालय मारहाण प्रकरण सामाजिक न्याय विभागतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना भोवलं आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीएला हटवले. शासकीय पीए प्रवीण शेट्ये, मारहाण झालेले लेखाधिकारी आणि दोन परेटर्सना यांना परत त्यांच्या मूळ विभागात पाठवलं, तर पीएस रविंद्र माने यांना हटवले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर बडोले यांचं कार्यालय आहे. त्यांच्या दालनाशेजारील कक्षात पीए, पीएस, अधिकारी, कर्मचारी बसतात. अरुण निटुरे शुक्रवारी (12 सप्टेंबर) दुपारी उस्मानाबादवरुन आले होते. अरुण निटुरे एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत आहेत. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला पैसेही दिल्याचा दावा केला आहे.

याच कामासाठी ते शुक्रवारी मंत्रालयात आले. बडोलेंच्या कार्यालयात त्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्या अधिकाऱ्याला कामाची विचारणा केली. शिवाय कामासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली, पण तरीही काम का होत नाही, असं विचारलं.

त्यावर त्या अधिकाऱ्याने मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असं म्हणताच, अरुण निटुरेंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पैसे घेऊनही मुजोरी करतोस, असं म्हणत अरुण निटुरेंनी मारहाण केली.

हा सर्व प्रकार घडला त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे पीएही उपस्थित होते. त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व प्रकार होऊन गेला होता.