मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं सुखरुप विसर्जन करणाऱ्या जलजीवरक्षकांचा प्रत्येकी अडीच लाखाचा विमा उतरवण्यात येणार आहे.


अनंत चतुर्दशी दिवशी जलजीवरक्षकांवर एखादं संकट आलं, तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

सध्या यासाठी 8 ते 10 मंडळांनी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासकडे नोंदणी केली असून, त्यांना गणेश विसर्जनाच्या काळात 40 हजाराची मदत करण्यात येणार असल्याचंही बांदेकर यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने अनेक रुग्णांसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते.

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीवेळी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने 1400 ते 1500 मुंबईकरांची निवाऱ्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं बांदेकर यांनी यावेळी सांगितलं.