मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर भाजप आक्रमकपणे हल्लाबोल करत आहे. आता शिवसेनेने मुखपत्र सामनामधून विरोधकांच्या विरोधावर संपादकीय लिहिलं आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, भाजप परमबीर सिंग यांना डोक्यावर बसून नाचत आहे आणि सरकारला बदनाम करण्यासाठी परमबीर सिंगचा वापर करत आहे. हा सर्व कटाचा एक भाग आहे.


सरकारच्या कारवाईमुळे भावनांचा उद्रेक 


सामनाच्या अग्रलेखात लिहिलं की, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भारतीय जनता पक्षाचे मत कालपर्यंत होते, पण त्याच परमबीर सिंग यांना आज भाजप डोक्यावर घेऊन नाचत आहे. पोलीस आयुक्तपदावरून जाताच परमबीर साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ दिले होते. खासदार डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, त्याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दबाव गृहमंत्री आणीत होते. यावरून मीडिया तसेच भाजपची आदळआपट सुरू आहे. परमबीर सिंग यांची राज्य सरकारने पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे. परमबीर सिंग यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो, मात्र शासनाच्या सेवेत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचे व ते प्रसिद्धी माध्यमांना पोहोचवायचे हे शिस्तीत बसत नाही."


पबवर कारवाई केली म्हणून निलंबन, पोलीस निरीक्षकाचे परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप


सरकारला अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर? 


"परमबीर सिंग हे नक्कीच एक धडाकेबाज अधिकारी आहेत. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या. सुशांत राजपूत प्रकरणात त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चांगला तपास केला. त्यामुळे सीबीआयला शेवटपर्यंत हात चोळत बसावे लागले. कंगना या नटीचे प्रकरण त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले, पण अॅण्टिलियाप्रकरणी त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले हे खरे असले तरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने असे पत्र लिहून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. परमबीर सिंग यांचे म्हणणे असे की, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करून द्यायला सांगितले. मुंबईतील 1750 बार-पबमधून हे पैसे उभे करावेत असे गृहमंत्र्यांचे म्हणणे होते, पण गेल्या दीडेक वर्षात मुंबई-ठाण्यातील पब्स-बार कोरोनामुळे बंदच आहेत. त्यामुळे हे इतके पैसे कुठून गोळा होणार, हा प्रश्नच आहे. परमबीर सिंग यांनी थोडा संयम ठेवायलाच हवा होता. पुन्हा सरकारला अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंग यांचा कोणी वापर करीत आहे काय? ही शंका आहेच."


गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप


केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ 


"देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे, हा एक कटाचाच भाग दिसतो. विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर महाराष्ट्रात चालवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यास हे परवडणारे नाही. एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. कुठे एखाद्या भागात चार कोंबडय़ा व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकेल असे एकंदरीत दिसते. महाराष्ट्राच्या संदर्भात कायदा-सुव्यवस्था वगैरे ठीक नसल्याचा ठपका ठेवायचा व राष्ट्रपती राजवटीचा हातोडा हाणायचा हेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अंतिम ध्येय दिसते व त्यासाठी नवी प्यादी निर्माण केली जात आहेत. परमबीर सिंग यांचा वापर याच पद्धतीने केला जात आहे हे आता स्पष्ट दिसत आहे."


परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह


बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल


"पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतोच हे लाकांनी गृहीत धरलेले आहे, पण पोलिसांपेक्षा जास्त भ्रष्टाचार इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयसारख्या खात्यांत आहे. मात्र या खात्यांचा जनतेशी संबंध येत नाही. मात्र पोलिसांचा रोजचाच संबंध आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा हीच अनेकदा सरकारची प्रतिमा ठरत असते. त्या प्रतिमेवरच विरोधी पक्षाने चिखलफेक केली. यात महाराष्ट्राची प्रतिमाही मलिन झाली याचा विरोधकांना विसर पडला असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. आज परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत व परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!"