मुंबई : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.


दोन दिवसांपूर्वी लोकमत आणि एबीपी माझाच्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, "परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या."  


याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."


परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात दादरा नगर हवेलीची खासदार मोहल डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचाही उल्लेख केला आहे. परमबीर सिंह यांच्या मते, 22 फेब्रुवारीला जेव्हा मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांच्या मृतदेहासह सुसाईड नोटही मिळाली. या नोटमध्ये कीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं डेलकर यांनी म्हटलं आहे. परंतु अनिल देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते.







अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले


दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे."


 






सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....