मुंबई : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिवसेनेने तो मुद्दा रेटून धरला पाहिजे. शिवसेनेने जर असं केलं नाही तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.


शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. आगामी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. मात्र प्रकाश आंबेडकर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही. पंरतु शिवसेनेने आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा सॅक्रिफाईज करु नये एवढीच माझी विनंती. त्यांनी सॅक्रिफाईज केलं तर त्यांचा राहुल गांधी झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंसमोर एकच मार्ग की आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होऊ द्यायचं नसेल तर तो मुद्दा त्यांनी रेटला पाहिजे."

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंची कारकीर्द

- राहुल गांधींचा जन्म 1970 तर आदित्य ठाकरेंचा जन्म 1990

- राहुल यांनी 2004 साली राजकारणात प्रवेश केला, म्हणजे राहुल यांच्या गाठीशी 15 वर्षांच्या राजकारणाचा अनुभव तर आदित्यने 2010 साली युवासेनेचं काम हातात घेतलं

- राहुल गांधी 4 वेळा खासदार बनले तर आदित्य ठाकरेंनी आजवर एकही निवडणूक लढलेली नाही

आता प्रकाश आंबेडकरांचा हा सल्ला फक्त काळजीपोटी आहे की त्यामागे रणनीती आहे. हे फक्त बाळासाहेबांनाच ठाऊक.


एमआयएमसोबती युतीबद्दल आंबेडकर म्हणतात...
खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती तुटल्याचं जाहीर केलं. याविषयी आंबेडकर म्हणाले की, "असदुद्दीन ओवेसी आणि माझी बोलणी सुरु आहे. त्यामुळे इतर कोणी काय बोलतंय, काय करतंय याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. मतदारांच्या मनात अजिबात संभ्रम नाही. कारण ही युती ओवेसींनी केली आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून येत नाही तोपर्यंत युती कायम आहे."