मुंबई : मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट सामना झाला. मुंबईकरांनी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा दिल्या. बहुमतापासून दोन्ही पक्ष दूर राहिल्यानं आता नवा संघर्ष सुरु झाला आहे, तो महापौरपदाचा.


शिवसेनेनं निवडणूक झाल्याझाल्याच महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली. सेनेने 84 आणि 4 अपक्षांसह आपला आकडा 88 वर नेला. मात्र या आकड्यांसह शिवसेनेला महापौरपद जिंकणं तितकंसं सोपं नाही. त्यामुळेच इतकी वर्ष ज्या काँग्रेसविरोधात सेनेचा लढा सुरु होता, ती काँग्रेस आता अस्पृश्य वाटत नाही.

शिवसेना महापौरपदासाठी अप्रत्यक्ष तडजोडीला तयार आहे, शिवाय मनसेनंही मराठी माणसाच्या हिताचाच निर्णय राज ठाकरे घेतील असं म्हटलं आहे, त्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीनंही घेतली आहे. काँग्रेसला सोबत घेऊन समाजवादी पक्ष, एमआयएम अशा छोट्या पक्षांसह महापौरपदाचा उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

अपक्ष शिवसेनेसोबत गेले, एमआयएम, सप भाजपसोबत येणार नाही, काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार नाही, राष्ट्रवादीच्या 9 जागांनी भाजपचं भागणार नाही, मनसेनं मराठी अस्मितेला महत्व दिलं आहे. त्यामुळे भाजपला 82 वरुन पुढे सरकण्यासाठी फोडाफोडीची जादू करावी लागेल.

9 तारखेला शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोण हात वर करतं किंवा कोण मतदानापासून दूर राहतं, यावर महापौरपदाच्या खुर्चीचं भवितव्य ठरणार आहे. पण कुणाची हजेरी असावी आणि कुणाची नसावी यासाठी पडद्यामागचं राजकारण आतापासूनच सुरु झालं आहे.

संबंधित बातम्या :


मनसेच्या सात नगरसेवकांची शिवसेनेला साथ?


...त्यापेक्षा काँग्रेस परवडली : सामना