मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने इव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी अमरावतीत आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली, तर तिकडे कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता.


अमरावतीत फेरमतदान घेतलं जावं, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून करण्यात आली. या बंदला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळला. आपली दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.

तर कोल्हापुरात भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी ज्या जिल्हा परिषद गटातून उभ्या होत्या, त्या गटातील विरोधकांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे निवेदनही देण्यात आलं.

इकडे मुंबईतील घाटकोपरच्या वॉर्ड क्रमांक 127 मध्ये इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा, बोगस मतदान, मतदार यादीत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे  पुर्नमतदानप्रक्रियेची मागणी घाटकोपरमधील भाजप, काँग्रेस, मनसे, भारीप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केला आहे.

घाटकोपर वॉर्ड १२७ मध्ये शिवसेनेचे तुकाराम उर्फ सुरेश पाटील विजयी झाले.

मात्र, भाजपच्या रितू तावडे, काँग्रेसचे केतन शहा, मनसेचे गणेश भगत, भारीपचे संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रमनी जाधव यांनी घाटकोपरच्या मतदार यादीत मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. तसंच, अनेक ठिकाणी इव्हीएम मशिन दोन तास बंद असल्याचा आरोप केला आहे.