राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2017 04:09 PM (IST)
मुंबई: पारदर्शक व्यवहार फक्त मुंबई महापालिकेचाच असला पाहिजे असं नाही, तर तो राज्य आणि केंद्र सरकार यांचाही हवा. सर्व महापालिकेत पारदर्शक व्यवहार व्हायला हवेत, असा पलटवार शिवसेनेने केला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना- भाजपची युतीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र भाजपने पारदर्शकता हा मुद्दा पुढे करुन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पारदर्शकता हाच मुद्दा घेऊन, शिवसेना आमदार अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला. केवळ मुंबई महापालिकेत पारदर्शकता नको, तर सर्वच महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार यांचा कारभारही पारदर्शी हवा, असं अनिल परब म्हणाले. नोटबंदीचा निर्णय हा एकतर्फीच झाला. तो निर्णयदेखील पारदर्शक झाला, असं म्हणायचं असेल तर इतका गदारोळ झाला नसता, असा निशाणा परब यांनी साधला. नागपूर महापिलेकेत शेवटच्या वर्षाचं महापौरपद शिवसेनेकडे असेल असं ठरलं होतं. पण ते दिलं नाही. मग हा पारदर्शक व्यवहार आहे का? असा सवालही अनिल परब यांनी केला. किरीट सोमय्या यांना आम्ही तेव्हा गांभीर्याने घेऊ, जेव्हा भाजप ती अधिकृत भूमिका असल्याचं सांगेल, असं परब म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत विरोधी पक्षनेते आणि पत्रकार यांचाही समावेश करावा. जेणेकरून पारदर्शक व्यवहार जनते समोर येईल, असा सल्ला परब यांनी दिला.