मुंबई : राज्यापालांनी घटनेचा खून करु नये अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.


संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "विधान परिषदेच्या 12 जागा तुम्ही कशा रिकाम्या ठेवू शकता? आज 10 महिने होत आले, तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का घटनात्मक पदावर बसून. तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो? की, जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारसी ज्या केलेल्या आहेत, त्यावर सही करणार नाही, असा आदेश राज्यपालांना आले आहेत का? हे राज्यपालांनी स्पष्ट केलं पाहिजे. पण 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे. आणि हा महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा अपमान आहे."


भाजपच्या नेत्यांना उद्देशून बोलताना संजय राऊत म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाला जर याविषयी काही वाटत असेल, आणि जर ते महाराष्ट्राचं काही देणंघेणं लागत असतील, तसेच त्यांच्या घटनेशी काही संबंध असेल, तर त्यांनी राज्यपालांना जाऊ सांगायला पाहिजे." पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राजकीय मतभेद, राजकीय लढाया आम्ही लढू. पण तुम्ही घटनेचा खून करु नका."


पाहा व्हिडीओ : राज्यपालांनी घटनेचा खून करु नये; संजय राऊतांचं टीकास्त्र



नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; वसंत गिते, सुनील बागुल यांची घरवापसी


नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गिते आणि बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. त्यामुळे आज शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; वसंत गिते, सुनील बागुल यांची घरवापसी