डोंबिवली: कल्याण-भिवंडी-ठाणे या मेट्रो 5 प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन डोंबिवलीत 'झुठ बोले कौआ काटें', अशा आशयाचं बॅनर लावून शिवसेनेने पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण-भिवंडी-ठाणे मार्गाला जोडणाऱ्या मेट्रो 5 आणि मेट्रो 9 च्या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईच्या विस्तारित भागाला जोडणारा हा फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प मानला जातो. 2022-23 पर्यंत पावणेतीनशे किलोमीटरचे मेट्रो मार्ग उपलब्ध होतील, असा दावाही मोदींनी यावेळी केला.

मात्र शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत बॅनरबाजी करत कल्याण मेट्रोच्या कामाचा लेखाजोखा पुराव्यांसकट बॅनरवर मांडला. भाजप मेट्रोचं श्रेय घेत आहे, पण ये पब्लिक है सब जानती है, असा टोलाही लगावला.

दरम्यान, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि नगरसेवक यांनीही उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेकडून मेट्रोच्या श्रेयवादासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती.

तर त्याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमिपूजन केलं होतं. त्यावर भाजपने बहिष्कार घातला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसत आहे.

संबंधित बातम्या

मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो भूमीपूजनावर शिवसेनेचा बहिष्कार

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 5 चं कल्याणमध्ये भूमिपूजन