मुंबई:  मला सुशांतच्या कुटुंबियांची काय मागणी आहे ते माहिती नाही. त्याच्या परिवाराने पाठवलेल्या नोटिशीची कल्पना नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली आहे, तर मी माफी मागेन, असं शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद करताना ते म्हणाले की, मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचा परिवार त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय. काय करायचंय ते आम्ही आणि त्यांचा परिवार पाहू मीडियानं काही बोलायचं काही काम नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.


ते यावेळी म्हणाले की, राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्याच सगळं हे वाहून गेलंय. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यात हे सरकार पाडणं, अस्थिर करणं याच रस आहे त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या शेकत राहावं, असं ते म्हणाले.

सुशांतच्या परिवाराकडून नोटीस आल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, आम्हाला खूप काम आहे. आम्हाला 50-100  नोटिसा येत राहतात. बाकी काही मला माहिती नाहीये. मला काहीच माहिती नाहीये, योग्य वेळ आल्य़ावर बोलू, असं ते म्हणाले.

राज्य सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा एखाद्या प्रकरणामुळे सरकार अस्थिर होत असेल तर मग आधी केंद्रातलं सरकार पडेल. अशावेळी राजकारण केलं जातंय. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

पार्थ पवारांची भूमिका वेगळी नाहीये. आम्ही सगळे एकत्र आहोत, असंही ते म्हणाले.

मुंबई पोलीस सक्षम आहेत, तेच हे हा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन, त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, या प्रकरणाला न्याय मिळो, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करतायंत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू, असं देखील राऊत म्हणाले.