मुंबई :  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात देशभर चर्चा सुरु असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या  ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र, राज्य सरकारवर घणाघात करण्यात आला आहे.


बुलेट ट्रेन प्रकल्पानं रोजगार निर्मिती होईल असं सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पैसा गुजरात-महाराष्ट्राचा असेल पण लाभ मात्र जपानलाच होणार आहे. कारण जपान त्यांच्या देशातल्या यंत्रसामग्रीचा वापर करणार. तसेच जपानी कंपनीनं भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास विरोध केला आहे. अशा शब्दांत मोदींच्या बुलेट ट्रेनवर शिवसेनेनं टीका केली आहे.

‘मोदींचे हे स्वप्न सामान्य माणसांचे नाही. ते श्रीमंतांचे आणि व्यापारी वर्गाच्या कल्याणाचे आहे. त्यासाठी खास पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्री केले. सुरेश प्रभू यांच्या काळात रेल्वेचे अपघात झाले म्हणून त्यांना रेल्वे मंत्रालयातून जावे लागले; पण पीयूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंधरा दिवसांत सात वेळा रेल्वे रुळावरून घसरली आहे व रेल्वे प्रवासाचा बोजवारा उडाला आहे, पण गोयल यांना ‘बुलेट ट्रेन’या एकाच कामासाठी तेथे नेमले असावे.’ अशी थेट टीका शिवसेनेनं केली आहे.

‘सामना’तील अग्रलेखावर एक नजर :

बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असे सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्णझाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळय़ापासून रुळापर्यंत, खडीपासूनसिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीनेविरोध केला आहे. त्यामुळे जमीन  आणि पैसा महाराष्ट्राचा व गुजरातचा;लाभ मात्र जपानचा. ही लूट आणि फसवणूक असली तरी पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पास आम्ही शुभेच्छा देत आहोत. गुजरातच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गास नवे काहीतरी द्यावेच लागेल. मुंबईची लूट बुलेट ट्रेनने होऊ नये हीच आई जगदंबेचरणी प्रार्थन!

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनचा साफ बोजवारा रोज उडत असला तरी आता अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून पडले आहेत. महाराष्ट्राचे आमदार-खासदार त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत मागण्या करीत आहेत. त्या तशाच अधांतरी ठेवून ‘बुलेट ट्रेन’ न मागता मिळत आहे. बुलेट ट्रेन हा नक्की कोणत्या समस्यांवर उतारा ते माहीत नाही; पण हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते व त्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आज होत आहे. पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत १४ सप्टेंबरच्या मुहूर्तावर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. मोदी यांचे हे स्वप्न आहे व पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नाला विरोध करण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही कदापि करणार नाही, कारण पंतप्रधान जे करीत आहेत ते राष्ट्रहित डोळय़ासमोर ठेवूनच करीत आहेत.

पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगलपासून भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरपर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांचा पाया घातला. देश तंत्रज्ञान, विज्ञानात पुढे जावा यासाठी अनेक योजनांची पायाभरणी केली. कारण ती सर्व देशाची गरज होती. या राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते काय, एवढाच काय तो मुद्दा आहे. १ लाख ८ हजार कोटींचा हा मोदींचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबादचे ५०८ किलोमीटरचे अंतर ताशी ३५० कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील १५६ कि.मी., गुजरातमधील ३५१ कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे, पण यातील फक्त चारच स्टेशन्स महाराष्ट्रात असून आठ स्टेशन्स गुजरातमध्ये आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातूनही जमीन संपादन करावी लागेल. त्यामुळे बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार हे नक्कीच.

‘बुलेट ट्रेन’ला आमचा विरोध असण्याचे कारण नाही, पण आधी शब्द दिल्याप्रमाणे काहीच घडताना दिसत नाही. हा संपूर्ण प्रकल्प जपान सरकारच्या पैशाने व सहकार्याने पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आता १ लाख ८ हजार कोटी केंद्राला खर्च करावे लागतील व महाराष्ट्राला त्यातले किमान ३० हजार कोटी रुपये नाहक द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही लढा उभा केला. तेव्हा कर्जमुक्ती केली तर राज्यात अराजक माजेल आणि अराजक माजावे अशी काही लोकांची इच्छा असल्याचा गळा मुख्यमंत्र्यांनी काढला होता. मग आता पंतप्रधानांच्या ‘श्रीमंत’ स्वप्नासाठी ३० ते ५० हजार कोटी रुपये टाकत आहात. त्यामुळे अराजक माजणार नाही काय, याचे उत्तर मिळायलाच हवे. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी वर्षानुवर्षांची आहे. बुलेट ट्रेनची मागणी तर कुणीच केली नाही, पण कोणतीही मागणी नसताना एका रेल्वे रुळावर ३० हजार कोटी उधळणे यास काय म्हणायचे?

बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळय़ापासून रुळापर्यंत, खडीपासून सिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. नोकरवर्गही जपानमधून आयात होणार आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीने विरोध केला आहे. त्यामुळे जमीन  आणि पैसा महाराष्ट्राचा व गुजरातचा; लाभ मात्र जपानचा. ही लूट आणि फसवणूक असली तरी पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पास आम्ही शुभेच्छा देत आहोत. गुजरातच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गास नवे काहीतरी द्यावेच लागेल.

संबंधित बातम्या :

शिंजो आबेंचं जोरदार स्वागत, अहमदाबादेत आबे-मोदींचा रोड शो

बुलेट ट्रेन ते गिफ्ट सिटी… मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव?

शिंजो आबे यांच्यासाठी डिनरला गुजराती-जपानी पक्वान्नं

LIVE : देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं थोड्याच वेळात भूमिपूजन