मुंबई: आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले अशी टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde Dasara melava Speech) यांनी केली. आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत, त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 


सावरकरांचा अपमान ज्यांनी केला तो मणिशंकर अय्यर याला बाळासाहेबांनी जोडे मारण्याचे काम केलं आणि त्याच काँग्रेसचे जोडे आज हे लोक उचलत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करतात आणि आमच्याकडेच 50 कोटींचा मागणी करताय


निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले. त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले. 


मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले


पवारांकडे दोन माणसं पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा असं त्यांना सांगितलं. 2004 सालापासून त्यांना ही इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातलं पाणी पण हलू दिलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी समजू दिलं नाही. सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले. 


हिंमत केली, सरकार आडवं कलं आणि इकडे आलो


तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यानी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हिंमत करून, सरकार आडवं करून मी तिकडून इकडे बसलोय. तुमच्यातील एक जण उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तमाम जनता माझ्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पदाची कसलीही लालसा नाही. मी दावोसमध्ये जातो आणि मुंबईच्या नाल्यामध्ये उतरतो, गरीबांच्या वसतीमधील शौचालयाची पाहणीदेखील करतोय. 


कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता, त्या काळात पीपीई किट घालून स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि लोकांच्या भेटीला गेलो. तुम्ही घरी बसून पैसे मोजत होता. खिचडीमध्ये घोटाळा केला, डेड बॉडी बॅगेत घोटाळा केला. 


26 जुलै 2005 सालच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात गेलात. तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकला नाहीत आमचे काय होऊ शकता. 


राज ठाकरेंबद्दल आनंद दिघेंनी दोन शब्द चांगले बोलले आणि यांच्या पोटात दुखायला लागलं


राज ठाकरे यांच्याबद्दल धर्मवीर आनंद दिघेंनी दोन शब्द चांगले बोलले, लगेच यांच्या पोटात दुखलं. त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू केलं, मी साक्षीदार आहे. त्यांचा अपघात झाला, त्यावेळी आले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतरही आले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर मला विचारलं की आनंद दिघेंची संपत्ती कुठे आहे. 


उद्धव ठाकरेंनी जर ठरवलं तर त्याचा काटा काढतातच. अशा अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. या एकनाथ शिंदेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मला लक्षात आल्यानंतर त्यांचाच टांगा पलटी अन् घोडे फरार केला. 


ही बातमी वाचा: