मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही कौटुंबिक होती.”, असे संजय राऊत यांनी सांगितले.   “राहुल गांधी आणि वरुण गांधी दिल्लीत रोज भेटतात. म्हणून काय रोज ढवळून काढायचे का? राज ठाकरे 'मातोश्री'वर गेले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरातिथ्य करण्याची 'मातोश्री'ची परंपरा आहे आणि राज ठाकरे तर घरातलेच आहेत.”, असे संजय राऊत म्हणाले.   राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी भेट घेतल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “संपत्तीच्या वादाचे प्रकरण हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत.”   “महापालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांच्या ‘मन की बात’ लवकरच समोर येईल. निवडणुका फार लांब नाहीत. शिवसेनेच्या मोठ्या विजयासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत.”, असे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले.   “राज उद्धव हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी चर्चा एकांतात नाही करायची तर का शिवाजी पार्कात करायची? भाऊ किंवा दोन नेते भेटतात तेव्हा चर्चा ही बंद खोलीतच होते. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचे मोठे भाऊ आहेत, कुटुंबाचे कर्ते पुरुष आहेत.”, असेही राऊत म्हणाले.  

संबंधित बातम्या :

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमागील गुपित उलगडलं?

जयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप

“शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती”

“उद्धवनी बाळासाहेबांना अंधारात ठेवून ‘त्या’ कागदावर सही घेतली”

शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी