नवी मुंबई : निवडणुकीनंतरही राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील एबीपी माझाशी बोलत होते.


18 फेब्रुवारीला शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु शिवसेना पाठिंबा काढून घेणार नाही. मुंबई महापालिकेतील वाद जागावाटपावरुन आहे. पण हा वाद पाठिंबा काढण्यापर्यंत जाणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

"शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार पडणार, मध्यावधी निवडणुका होणार, आम्ही पाठिंबा देणार नाही, हा शरद पवारांचा स्वभाव आहे. त्यांनी असं विधान केलं की दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र त्या विधानाभोवती चालतो, असा त्यांचा अनुभव आहे. पण शिवसेना पाठिंबा काढणार नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे राज्य जावे, ही श्रींची इच्छा

उद्या हे सरकार पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याला राष्ट्रवादी हातभार लावेल, असं पवार म्हणाले. तसंच वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं त्यावेळी, हे राज्य जावे ही श्रींची इच्छा, असा अग्रलेख छापण्यात आला होता. त्याचा संदर्भ देत, हे राज्य जावे ही श्रींची इच्छा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पवार म्हणाले होते.

पवारांच्या विधानावर वस्तूस्थिती अवलंबून नाही

पवारांच्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "गॅप गेल्यावर पवारांना स्टेटमेंट द्यावसं वाटतं. पवार काय विधान करतात यावर वस्तूस्थिती अवलंबून नाही. पण शिवसेना पाठिंबा काढणार नाही आणि शरद पवारांच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. भाजपचे 123, अपक्ष 10 आणि शिवसेनेचे 63 आमदार सोबत आहेत. त्यामुळे पाच वर्ष सरकारला कोणताही धोका नाही."
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद

दुसरीकडे नाशिकपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे. जिल्हा परिषद आणि  महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद आहे. शिवाय हा वाद सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींसाठी घातक असल्याचंही पाटील म्हणाले.