मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. उद्या दुपारी १ वाजता बी-७ या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युतीबाबत फोनवरुन चर्चा झाली. मात्र, त्यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.


दरम्यान, काल रात्री भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक पार पाडली. त्यात भाजपनं फक्त पारदर्शक कारभाराचा मुद्दा शिवसेनेसमोर मांडला. याच मुद्द्यावर आज शिवसेना आमदार आणि युतीच्या चर्चेत महत्वाची भूमिका बजवणारे अनिल परब यांनी भाजपवर पलटवार केला.

'केवळ मुंबई महापालिकेत पारदर्शकता नको, तर सर्वच महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार यांचा कारभारही पारदर्शी हवा.' असं अनिल परब म्हणाले.

'नोटबंदीचा निर्णय हा एकतर्फीच झाला. तो निर्णयदेखील पारदर्शक झाला, असं म्हणायचं असेल तर इतका गदारोळ झाला नसता.' असा निशाणा परब यांनी साधला.

संबंधित बातम्या:

राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना