खडसेंनी सत्तेचा वापर करुन मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतरांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीच सत्ता आज खडसेंवर उलटली आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
“खडसे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंचावर दिसतात. चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत”, असं टीकास्त्र ‘सामाना’तून सोडलं आहे.
खडसे हिरो बनायला निघाले होते, पण राजकीय मंचावर त्यांना साईड रोल मिळाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तोही काढून घेतला. त्यामुळे खडसे आज भाजपच्या राजकारणातून बाद झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना ते पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे, असं सामनात नमूद करण्यात आलं आहे.