- पाकिस्तानची घुसखोरी सुरूच आहे व त्यांना रोखताना आमचे जवान रोज शहीद होत आहेत. पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मित्र जगात आहेत. अमेरिकेचे ट्रम्प व रशियाचे पुतीन हे तर खास दोस्त आहेत. पण पुतीन यांच्या रशियातच पाकिस्तानी सैन्याला खास प्रशिक्षण व युद्ध अभ्यास दिला जातो. तोच पाकडा आज आमच्यावर बंदूक ताणून उभा आहे. मोदी हिंदुस्थानची ही भूमिका पुतीन यांना कधी सांगतील काय?
- देशातील सर्व विरोधकांना धाराशायी केल्याचा आनंद मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतो, पण पाकिस्तानला धाराशायी केल्याचा आनंद हा देश कधी साजरा करणार? तो आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठीच जनतेने तुम्हाला सिंहासनावर बसवले आहे. मेजर कौस्तुभ राणे, कर्नल महाडिक यांच्यासह शेकडो मराठी जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. देशाचे संरक्षण करणे हाच महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. इतर ‘तागडी’बाज राज्ये फक्त नोटा मोजण्यात व उधळण्यात मग्न असताना शिवरायांचा महाराष्ट्र सीमेवर लढतो व हौतात्म्य पत्करतो. म्हणूनच राष्ट्रीय प्रश्नांवर मत व्यक्त करण्याचा जन्मसिद्ध हक्क आम्हाला प्राप्त झाला आहे.
- देशाचा ‘जीडीपी’ की काय तो वाढायचा तेव्हा वाढेल, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सैनिकांची बलिदाने कमी होणार आहेत काय? पैसा फेकून, ई.व्ही.एम. बंद पाडून निवडणुका जिंकणे आता सोपे आहे, पण ‘कौस्तुभच काय, आणखी मुले असती तर तीदेखील देशासाठी दिली असती,’ असे सांगणाऱ्या शहीद कौस्तुभच्या पित्याची हिंमत बाजारात मिळत नाही. ती विकत घेता येत नाही.
- पाकिस्तानात सत्तापालट झाला आहे व हिंदुस्थानविरुद्ध सतत गरळ ओकणाऱ्या इम्रान खानचे म्हणजे तेथील सैतानी लष्करशाहीचेच राज्य तेथे आले आहे. हिंदुस्थानशी सतत युद्धाची भाषा करणे व कश्मीरात असंतोष निर्माण करणे हीच पाक सैन्याची रोजीरोटी आहे. मग कश्मीर वाचवणे व सैनिकांची रोजची बलिदाने वाचविणे हे आपल्या राज्यकर्त्यांचे कर्तव्य नाही काय?
- महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या व २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जा. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, तसे नक्राश्रू ढाळणाऱ्यांचेही नको! मग कुणी काय समजायचे ते समजो.
आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार? : शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2018 08:25 AM (IST)
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईच्या मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधल आहे.
मुंबई : ‘शहीदांना श्रद्धांजल्या देणे आणि पुष्पचक्र अर्पण करणे हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे. त्यातच ते समाधानी आहेत. महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या मगच 2019 च्या निवडणुकांना सामोरे जा,’ अशा परखड शब्दात शिवसेनेनं भाजप सरकारवर टीका केली आहे. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डीजे वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको असल्याचे सांगत 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर बोचरी टीका केली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईच्या मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधल आहे. एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर : कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार?