मुंबई : ईडीच्या नोटीसनंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची नोटीस आज संध्याकाळी मिळाली, त्यात कुठल्याही प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख नाही. केवळ 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं असं नोटीसमध्ये म्हटलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. 


नोटीसमध्ये स्पष्ट कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे ही नोटीस कशा संदर्भात आहे हे आता सांगता येणे सध्यातरी कठीण आहे. नोटीसमध्ये सविस्तर काही लिहीलं नाही त्यामुळे कुठल्या कारणास्तव ही नोटीस दिली हे सांगता येणार नाही. केवळ चौकशीसाठी बोलावल्याचा त्यात उल्लेख आहे. यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याला उत्तर देऊ. ईडीची नोटीस येईल ही असा अंदाज होताच. आता कायदेशीर बाबींचा विचार करुन याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 


संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."






पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा- किरीट सोमय्या


मी गेल्या चार महिन्यांपासून याबद्दल बोलत आहे. त्यामुळे रत्नागिरीची मुद्दा पुढे करुन घोटाळेबाजांना पाठिशी घालू नका, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटलं. अनिल देशमुख, आता अनिल परब आणि पुढचा नंबर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांचा असेल, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी किती माया गोळा हे संजय राऊतांनी अनिल परब यांना विचारावे. आरटीओ ट्रान्सफरपासून इतर गोष्टीतून अनेक पैसे वापरले असं अनिल परब यांनी कबूल केलं असा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे.