Shivsena : शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीने खोलवर पोखरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता काल राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आपसूक कोसळले. अर्थातच, सरकार कोसळण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या बंडवीर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नजरेतील महाशक्तीने पडद्यामागून त्यांच्याच तोडीची रसद दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. 


एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यापासून सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेल्या आघाडीवर सातत्याने टीका केली आणि भाजपशी पुन्हा जुळवून घेण्यास सांगत होते. मात्र, भाजपचा सेना कणाकणाने संपवण्याचा धूर्त डाव लक्षात आल्याने अडीच वर्षांपूवीच काडीमोड घेतला होता. त्यानंतरही भाजपकडून सेनेवर झालेले प्रहार पाहता ते पुन्हा भाजपकडे वळतील याची सुतरामही शक्यता नव्हती आणि झालेही तसेच.   


शिवसेनेला धरून भाजपने राज्यात आला, पण संपली शिवसेनाच 


भाजप-शिवसेना युतीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शिवसेनेची वाताहत होत चालल्याचे  स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या 33 वर्षांत भाजपने शिवसेनेला हाताशी धरून राज्यात 42 जागांवरून थेट 2019 च्या निवडणुकीपर्यंत 106 जागांवर पोहोचला. दुसरीकडे शिवसेना 1995 मध्ये जिंकलेल्या सर्वाधिक 73 जागांवरून 2019 पर्यंत केवळ 56 जागांवर पोहोचली. त्यामुळेच युतीत 25 वर्ष आमची सडली हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य लक्षात येतं. 


33 वर्षांपूर्वीच भाजप शिवसेनेची युती 


तत्कालिन भाजप सरचिटणीस प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवसेना आणि भाजप युती झाली होती. 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1989 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली. त्यापूर्वीही दोन्ही पक्षांमध्ये राजकीय मैत्री होती. 


1990 मध्ये शिवसेनेला 52, तर भाजपला 42 जागा


बाळासाहेबांच्या कार्यकाळामध्ये राज्याच्या राजकारणात शिवसेना नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा अशा निर्णयाने युती अस्तित्वात आली होती. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकूण 288 जागांपैकी 183 जागा लढवल्या, तर भाजपने 104 जागांवर उमेदवार उभे केले. त्या निवडणुकीत शिवसेनेला 52 तर भाजपला 42 जागा मिळाल्या. शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले.


1995 मध्ये भाजप-शिवसेनेने पुन्हा निवडणूक लढवली. राममंदिर आंदोलनामुळे हिंदुत्वाची लाटेत शिवसेनेने 73 जागा जिंकल्या, तर भाजपला 65 जागा मिळाल्या. या जोरावर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, हाच फॉर्म्युला नंतर दोन्ही पक्षांतील वादाचे मूळ ठरला. शिवसेना आणि भाजपने 1999 च्या निवडणुकाही एकत्र लढल्या. शिवसेनेला 69 तर भाजपला 56 जागा मिळाल्या. तथापि, युतीला केवळ 125 जागा मिळाल्या, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले. 


2004 मध्येही शिवसेना आणि भाजपने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या. जास्त जागा जिंकल्याने पुन्हा एकदा शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मात्र, नारायण राणे 2005 मध्ये डझनभर आमदारांसह काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपने शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. मात्र, शिवसेनेने फेटाळून लावला.


2009 मध्येही विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, भाजपने पहिल्यांदाच शिवसेनेला मागे टाकले. या काळात भाजपला 46 तर शिवसेनेला 45 जागा मिळाल्या. या दरम्यान भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळाले.


2014 मध्ये युती तुटली 


2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागांची मागणी केली. तथापि, एकमत न झाल्याने 25 वर्षे जुनी युती तुटली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही आघाडी होऊ शकली नाही. भाजपले 122 जागा जिंकल्या, शिवसेनेला केवळ ६३ जागा जिंकता आल्या. याच काळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, काही दिवस विरोधी पक्षात बसल्यानंतर शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होऊन 12 मंत्रीपदे मिळवली. इथूनच शिवसेना मोठ्या भावाकडून लहान भावाच्या भूमिकेत आली.


2019 मध्ये निवडणूक जिंकूनही शिवसेना-भाजप फुटले


2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची गरज भासू लागली. फेब्रुवारीमध्ये फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारमधील पद आणि जबाबदाऱ्या इतर गोष्टींबरोबरच समान वाटून घेतल्या जातील. मात्र, लोकसभेच्या निकालाने भाजपला पुन्हा एकदा शिवसेनेवर दबाव आणण्यात यश आले.


यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्त, तर शिवसेनेने कमी जागा लढवल्या. या काळात भाजपला 106 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 2014 च्या तुलनेत केवळ 56 जागा कमी मिळाल्या. यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली, पण भाजपला ते मान्य नव्हते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती तुटली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.