पुणे : राजकारणात भूमिका बदलल्या की मित्र बदलतात, हे अनेकदा दिसून आलं आहे. राज्यातही लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक सर्वांनी पाहिली. मात्र महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आणि दोन्ही नेत्यांमधील दुरावा वाढल्याचं समोर येत आहे. राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढला होता. या मोर्चावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलं की, सगळ्या गोष्टींची फार गांभीर्याने दखल घेण्याची गरज नसते.


राज ठाकरे यांनी रविवारी मोर्चानंतर केलेल्या भाषणात घुसखोरांविरोधात बोलताना म्हटलं की, दगडाचं उत्तर दगडानं दिलं जाईल आणि तलवारीचं उत्तर तलवारीनं दिलं जाईल. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ठीक आहे, सगळ्या गोष्टींची फार गांभीर्याने नोंद घ्यायची गरज नसते. शेवटी राज्याच्या राजकारणावर ज्यांच्यामुळे परिणाम होऊ शकतो, अशांची दखल घ्यायची असते. काही नेत्यांची भाषणं ऐकायला लोक येत असतात, काहींची भाषणं बघायला येत असतात. अशी भाषणं ऐकायला येणाऱ्यांसाठी ती एक करमणूक असते, असा टोला शरद पवारांनी लगावला.


Delhi Election Results | भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही : शरद पवार


भाजपच्या पराभवाची मालिका सुरु झाली आहे, ती थांबेल असं वाटत नाही. जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे. भाजपला पर्याय देणाऱ्या पक्षाला जनतेने कौल दिला. केजरीवालच जिंकतील असा कौल होता. त्यामुळे निकालाचं मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही, अशा शब्दात शरद पवार दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं.


Raj Thackeray | ... अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल : राज ठाकरे


काय म्हणाले होते राज ठाकरे?


आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांवर हल्लाबोल करताना म्हटलं होतं की, आम्ही मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. इथून पुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. बाहेरच्यांना हाकललंच पाहिजे त्यात कुठेही तडजोड केली नाही पाहिजे. कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय? सोबतच सीएए समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांवर देखील टीका केली.