मुंबई : लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरेंच्या सभेतील 'लाव रे तो व्हिडीओ'चा करिष्मा दिसू लागला आहे. लोकसभा निवडणुकीतील सभांमुळे राज ठाकरेंचं राजकीय वजन नक्कीच वाढलं आहे. कारण विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शरद पवारांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.


भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र आपली भूमिक बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं भाजपसोबत युती केली. एवढ्या आरोप-प्रत्यारोपानंतर शिवसेना-भाजपच्या युतीमुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचं शरद पवारांनी म्हटलं. बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकांवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. बाळासाहेबांचं तेच प्रतिबिंब आज राज ठाकरेंमध्ये दिसत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.



राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पीढीचा आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. त्यामुळे बाळासाहेबांना निवडणुकीत लगेच पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागणार आहे. राज ठाकरेंशी आमची याबाबत चर्चा झालेली नाही. मात्र राज ठाकरेंना आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.


विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचं राज्यातील सरकार घालवण्यासाठी जी समीकरणं जुळवावी लागतील, त्याचा विचार केला जाईल. अशारीतीने विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा गांभीर्यानं विचार सुरू असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.