सत्ता मिळवण्यासाठी भाजप कुठल्याही मार्गाला जात आहे: शरद पवार
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2017 07:30 AM (IST)
कल्याण: सत्ता मिळवण्यासाठी भाजप कुठल्याही मार्गाला जात असून देशातली लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कल्याणजवळच्या वरप गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवारांनी भाजपावर चांगलंच तोंडसुख घेतलं. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानं सामाजिक ऐक्य धोक्यात आल्याचं पवार म्हणाले. सध्या विरोधी पक्षात असल्यानं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करण्यासाठी मोठा वाव आहे, त्यासाठी एकत्र येऊन लढण्याचं आवाहन पवारांनी यावेळी केलं. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.