नवी मुंबई: पनेवलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून लोकांना रजिस्ट्रेनशसाठी मोठे हाल सोसावे लागत आहेत. अधिकाऱ्यांकडून सातत्याने केवळ सर्व्हर डाऊनचे कारण पुढे केले जात आहे. एबीपी माझाने याबाबत अधिकारी शैलेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही हतबल आहोत सांगत हात झटकले आणि वरिष्ठांकडे अंगुलीनिर्देश केले. 


सकाळी आठ वाजता आलेल्या लोकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंतही नंबर येत नाही. पण व्हीआयपी लोकांचे रजिस्ट्रेशन मात्र आतल्या दाराने सुरु असल्याची नागरिकांची तक्रार आहे. 


खरंतर आर्थिक वर्ष संपत आलं आहे, पुढील महिन्यात स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस वाढणार आहेत. यामुळे लोकांची पैसे वाचविण्यासाठी धावाधाव सुरु आहे. पण आबालवृद्ध, नोकरदार सगळ्यांना मात्र सरकारी कामांच्या दफ्तर दिरंगाईमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अधिकाऱ्यांकडून कुठलीही मदत मिळत नाही. उलट उन्हाच्या झळा सोसत लोकांनाच स्वतःच्या कामासाठी तासन् तास फेरे मारावे लागत आहेत. 


लोकांना उन्हातानात ऑफीसच्या बाहेर गर्दी वाढत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो आहे, बसण्यासाठी कुठलीही सोय करण्यात आलेली नाही. एकूण सरकारी कार्यालयातला उदासीनपणा स्पष्ट जाणवत असल्याची लोकांची तक्रार आहे. याबाबत आता वरिष्ठ पातळीवरुन आणि तांत्रिक विभागाकडून काय हालचाल होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


ABP Majha