...अन्यथा तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू : आ. अनिल परब
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2017 11:41 PM (IST)
31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्यास विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू, असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी दिलाय. एबीपी माझा विशेष या चर्चासत्रात अनिल परब बोलत होते.
मुंबई : 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल न लागल्यास विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू, असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी दिलाय. एबीपी माझा विशेष या चर्चासत्रात अनिल परब बोलत होते. निकालसंदर्भातली विनोद तावडेंची वक्तव्य म्हणजे त्यांचा अतिआत्मविश्वास आहे अशी टीका देखील परबांनी केली आहे. तावडेंनी दिलेल्या तारखेपर्यंत निकाल घोषित न झाल्यास तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठीच्या सर्व विभागाचे निकाल लागणं अशक्य असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. त्यामुळं तावडेंची अडचण चांगलीच वाढली आहे. विद्यापीठ प्रशासनानं 31 जुलैपर्यंत निकाल घोषित करणं शक्य नसल्याचं कबूल केल्यानं शिक्षणमंत्री विनोद तावडेंची धावपळ सुरू आहे. आज विनोद तावडेंनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या बैठकीत तावडेंनी विद्यापीठाच्या निकालासंदर्भातले आतापर्यंतचे तपशील राज्यपालांना दिल्याची माहिती मिळतेय. तसेच, निकालाच्या घोळावरून कुलगुरू संजय देशमुखांवर सुरू असलेल्या टीकेसंदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान उद्या रविवार असतानाही कुलगुरू संजय देशमुखांनी 4 महत्त्वाच्या बैठका बोलावल्या आहेत. संबंधित बातम्या