Coastal Road Project : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हिरवा कंदिल दिल्याने मुंबईतील (Mumbai) कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले आहेत. कोस्टल रोडच्या बांधकामाव्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करण्याला पर्यावरणाचे कारण देत याचिकेद्वारे एनजीओने विरोध केला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने संबंधित याचिका निकाली काढल्याने मुंबई महापालिकेला (BMC) दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टच्या या निर्णयामुळे आता हाजी अलीजवळ भूमिगत पार्किंग, सायकल आणि जॉगिंग ट्रॅक, मोकळ्या जागेमध्ये बाग, समुद्रकिनारी प्रोमोनेड आणि बटरफ्लाय पार्क उभारता येणार आहे. फक्त अम्युझमेंट पार्क उभारता येणार नाही.


मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोस्टल रोड प्रकल्प 14 हजार कोटी रुपयांचा असून तो नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय मुंबईकरांना संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल. तसंच रुग्णवाहिन्यांचा प्रवासही जलद होईल. कोस्टल रोड प्रकल्पाचा वेग कोरोनाच्या संकटामुळे मंदावला होता. परंतु या प्रकल्पाच्या कामाला चांगला वेग आला असून आतापर्यंत 58 टक्के काम पूर्ण झालं आहे. 


कोस्टल रोड प्रकल्पाविषयी
- मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
- एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. - - प्रकल्पामध्ये 4+4 मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.
- किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, 2018 मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. 
- एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. 
- त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरितपट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.
- एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे. 


प्रकल्पामुळे होणारे फायदे
- किनारी रस्त्यामुळे वेळेत 40 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत होणार आहे.
- किनारी रस्त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान उंचावेल.
- प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा आणि पुरापासून संरक्षण.