मुंबई : राजभवनातील कोरोनाची लागण गांभीर्यानं घेतली पाहिजे, परीक्षा घ्या हा आग्रह चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलं, राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. परीक्षा घ्या, परीक्षा घ्या… हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आग्रह किती चुकीचा आहे, हे त्यांना नियतीनंच दाखवून दिलंय. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचं का?, असा संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले की, हे ईश्वरानं दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, ईश्वर यांना मानणारे आहेत.


यावेळी ते म्हणाले की, कोणताही मुहुर्त काढा, आमचं सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असं ते म्हणाले.



परीक्षा घेणं विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं- सामंत

दुसरीकडे राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुनच परीक्षा घेणं किती धोकादायक आहे हे दिसून येत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना राजभवनातील जवळपास 18 जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी ट्विटवरुन मत व्यक्त करताना परीक्षा घेण्यासाठी वातावरण सुरक्षित नसल्याचं म्हटलं आहे. ' राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहोचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?,” असं सामंत यांनी म्हटलंय.  महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील स्वतःच्या तब्बेतीची देखील काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.


महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईतील राजभवनात 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. राज्यपालांच्या निवासस्थानी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता राजभवनात कुठल्याही बाहेरील व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पुढील आदेशापर्यंत सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत.  8 दिवसांपूर्वी राजभवनामधील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्या संपर्कात 24 अधिकारी-कर्मचारी आले होते. या सर्वांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं.