मुंबई : मुंबईतील उपनगरीय लोकलमधून धक्के खात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व्यथा विक्रमादित्य क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने मांडली आहे. लोकलच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेचं एकत्रीकरण करण्याची मागणी सचिनने केली आहे.


या प्रस्तावाच्या अंमलबजावणीत अडथळे असले, तरी तुम्ही माझ्या मागणीला पाठिंबा द्याल, अशी आशा सचिनने व्यक्त केली. सचिनने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून लोकल रेल्वेच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव ठेवला.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी सचिनने केली आहे. या महामंडळाला स्वायत्तता देण्यात यावी, त्याचप्रमाण भारतीय रेल्वेच्या नियंत्रणाखाली त्यांचा कारभार नसावा असं सचिनने पत्रात म्हटलं आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकत्रीकरण झाल्यास निर्णय प्रक्रियेला वेग येईल आणि अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील, असं सचिनला वाटतं.

उपनगरीय लोकल सेवा मुंबईकरांची जीवनवाहिनी असून दररोज 75 लाख नागरिक लोकलने प्रवास करतात. उपनगरीय लोकल सेवेचं व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी ही मागणी करत असल्याचं सचिनने सांगितलं.