मुंबई : सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने सर्वच क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावरुन सरकारवर टीका केली आहे. तसंच सचिन तेंडुलकरने यापुढे कोणत्याच सरकारी कार्यक्रमात जाऊ नये, असंही म्हटलं आहे.


आचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिनच्या अश्रूंचा बांध फुटला!

संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारचं काय चाललंय? पद्मश्री, द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांना सरकारी इतमामात अखेरची मानवंदना का दिली नाही? सचिन तेंडुलकर यांनी यापुढे कोणत्याच सरकारी कार्यक्रमात जाऊ नये. आचरेकरांची उपेक्षा संपूर्ण क्रीडा विश्वाचा अपमान आहे, जय महाराष्ट्र, असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही, क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी

रमाकांत आचरेकर यांचं 2 जानेवारी रोजी मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 87 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. काल (3 जानेवारी) त्यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पद्म पुरस्काराचे मानकरी ठरुनही आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यामुळे क्रिकेट विश्वात नाराजी पसरली आहे.

सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन

आचरेकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत ही जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असते आणि हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. मात्र तरीही आचरेकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. दुसरीकडे गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या दोन्ही व्यक्ती मोठ्या होत्या. मात्र आचरेकरांचं कर्तृत्त्व हे न समजण्याइतकं सरकारची बुद्धी लहान नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर समस्त क्रीडाप्रेमींची माफी मागावी अशा भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.