मुंबई: दहिहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आज शिवसेनेने सामनामधून जोरदार टीकास्र सोडलं आहे. लोकांनी लोकशाही पद्धतीने सरकार निवडलं आहे. त्यामुळे न्यायालयानं  आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये. असा सल्ला सामना या वृत्तपत्रातून दिला गेला आहे.


 

हिंदूंचे सण हे त्यांच्यासाठी श्रद्धेचे विषय आहेत, ते रोखण्याचा प्रयत्न केल्यास जनताच ते हाणून पाडेल आणि शिवसेना जनतेच्या असंतोषाचं नेतृत्व करेल असं शिवसेनेने म्हटलं आहे

 

सामनातील अग्रलेखावर एक नजर:

 

* गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार’ करणार्‍या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल.

 

*न्यायालयाने नुकताच एक फतवा जारी करून दहीहंडीच्या उत्सवावर निराशेचे विरजण टाकले आहे. उत्साह आणि शौर्याच्या इच्छेवर जोरजबरदस्ती करून हा ‘जर्म’ चिरडण्याचा प्रकार राष्ट्रहिताला मारक आहे.

 

* दहीहंडीची लांबीरुंदी मोजून थर लावावे म्हणजे चार थरांवर दहीहंडी लावता कामा नये. बालगोविंदांना ‘मटकी’ फोडायला चढवू नये, अशी एक नियमावली न्यायालयाने जारी केली. सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या न्यायालयाने ही काळजी घेतली आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील गोविंदा पथकांवर निराशेची गुळणी घेऊन हात चोळत बसण्याची वेळ आली. मुंबईतील दहीहंडी पथकांची कीर्ती जगभरात आहे. दहीहंडीचे हे ‘थर’ किंवा मनोरे बघण्यासाठी जगातून पर्यटक येतात. ही सर्व दहीहंडी पथके प्रशिक्षित असतात व ते वर्षभर ‘मनोरे’ रचण्याची तयारी करीत असतात.

 

* सण-उत्सवांच्या निमित्ताने आनंदाचे दोन क्षण येतात त्यावरही असे फतव्यांचे बडगे पडणार असतील तर या देशातील उत्साह व शौर्याची तिरडी निघाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला इतर धर्मात फार लुडबूड करायची नाही. आपल्या न्यायालयांचीही ती हिंमत नाही; पण गणेशोत्सवात श्रीगणेशाच्या मंगलमूर्तीस फुटपट्टी लावण्यापासून सार्वजनिक उत्सवांच्या मंडपाचा आकार ठरविण्यापर्यंत फतवे निघत आहेत. नवरात्रीचे उत्सवही त्याच न्यायालयीन फतव्यांच्या कचाट्यात सापडले आहेत.