मुंबई : वाहतूक कोंडी आणि लोकल, मेट्रोच्या गर्दीने हैराण असलेल्या मुंबईकरांच्या सेवेत आता रोपवेची सुविधा येणार आहे.  लवकरच मुंबईकरांचा प्रवास रोप वे नं होणार आहे.


मालाड ते मार्वे आणि बोरीवली ते गोराई या दोन्ही 4.5 किमी लांबीच्या अंतरासाठी रोप वे प्रकल्पाची एमएमआरडीए कडून उभारणी केली जाणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट असेल, अशी माहिती मिळाली आहे.

हा रोप वे प्रकल्प कितपत शक्य आहे हे पाहण्यासाठी मे. इंडियन पोर्ट रेल अॅन्ड रोपवे कॉर्पोरेशन लि. यांची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईतल्या रोपवे प्रकल्पामुळे पूर्व -पश्चिम भागांची जोडणी करता येणार आहे. या प्रकल्पामुळे, मालाड मेट्रो स्टेशन, मार्वे, बोरीवली रेल्वे स्थानक, मेट्रो 2 अ आणि गोराई जेट्टी पर्यंत पोहोचता येणार आहे. यापूर्वी असे रोपवे प्रकल्प न्यूयॉर्क, कोलंबिया, टर्की या ठिकाणी यशस्वी ठरले आहेत.

मेट्रो, मोनोसारख्या प्रकल्पांमधून लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता कमी वेळेत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी 'रोप वे'चा पर्याय एमएमआरडीएनं हाती घेतला होता.

यापूर्वीही 2016 मध्ये असा प्रस्ताव आला होता. उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी एमएमआरडीएनं  'रोप वे'चा पर्याय समोर ठेवला होता. पाश्चात्य देशांप्रमाणेच सर्वांचंच आकर्षण असलेले 'रोप'ने आता मुंबई ते घाटकोपर आणि बोरीवली ते ठाणे दरम्यान उभारण्याची योजना एमएमआरडीएनं हाती घेतली होती.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्यांच्याच सूचनेनुसार त्यावेळी तीन प्रकल्पांची आखणी करण्यात आली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे घोडबंदर रोड, वाशीच्या सागर विहार जेटी ते घाटकोपर बस डेपो आणि भिवपुरी रोड स्थानक ते माथेरानमधील गार्बेट लॉर्डस गार्डन असे ते तीन मार्ग होते.