कल्याण : रिक्षाचालकाचं अपहरण करुन जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी भाजपच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाबासाहेब कांबळे असं मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचं नाव असून तो डोंबिवली पूर्वेच्या शेलार नाका परिसरात राहतो. शनिवारी रात्री त्याला काही जणांनी जानकी हॉटेल परिसरातून रिक्षात उचलून नेल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे त्याचा भाऊ सिद्धार्थ याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याचा भाऊ बाबासाहेब कांबळे हा रक्तबंबाळ अवस्थेत शेलार नाक्यावर पडलेला आढळून आला.

भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी आपल्याला अपहरण करून उचलून नेलं आणि अज्ञात स्थळी नेऊन रॉड, वायरच्या साहाय्याने मारहाण केल्याची माहिती कांबळेने दिली.

जखमी अवस्थेत त्याला तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. याप्रकरणी रात्री उशिरा भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि इतर 5 ते 6 जणांच्या विरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनीही याबाबत काहीही बोलायला नकार दिला आहे.