कल्याण : थकीत मालमत्ता कराची वसूली होत नाही, तोपर्यंत कर विभागातील कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, अशी कडक भूमिका उल्हासनगर महापालिकेनं घेतली आहे. त्यामुळे तब्बल 140 कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगारच मिळाला नाही.


उल्हासनगर शहरात आजमितीला 1 लाख 77 हजार 517 मालमत्ता आहेत. मात्र 900 कोटींचं बजेट असलेल्या या महापालिकेत मालमत्ता कराची थकबाकी बजेटच्या निम्मी, म्हणजेच तब्बल 450 कोटी इतकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मागील दोन वर्ष कर्मचाऱ्यांना प्रशासनाने प्रोत्साहन देऊन पाहिलं, पण कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे यंदा अवघी 4 कोटींची वसूली झाली.


त्यामुळे प्रत्येक लिपिकाने दिवसाला 1 लाख रुपयांची करवसूली करण्याचे सक्तीचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले. मात्र तरीही फरक न पडल्यामुळे अखेर या महिन्यापासून जर वसूली केली तरच पगार मिळेल, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.


महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे कर विभागातील 140 कर्मचाऱ्यांना या महिन्यात पगारच मिळालेला नाही. विशेष म्हणजे कर विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनीच हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. त्यामुळे आता कर विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांची मात्र मोठी गोची झाली आहे.