मुंबई : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालक 9 जुलैपासून संपावर जाणार आहेत. ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे. ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेची आहे.


तसेच हकीम समितीच्या शिफारशी तात्काळ सुरु करण्यात याव्या आणि अशा इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारणार असल्याचं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेनं सांगितलं आहे.


उद्या मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील 18 लाख तर मुंबई, नवी मुंबईतील 1 लाख 75 हजार रिक्षा चालक-मालकांचा संपावर जाणार आहेत. नागपूरसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबई याठिकाणी संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.


काय आहेत मागण्या?


- ऑटोरिक्षा चालक मालक संघटनासाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून हे महामंडळ परिवहन खात्यातंर्गत असावे.
- विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरावे.
- राज्यात अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक असावं.
- हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षाचे भाडे वाढवण्यात यावे.
- ओला, उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर त्वरित बंदी घालावी.
- महाराष्ट्र राज्यात ऑटोरिक्षा विमामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तात्काळ कमी करण्यात यावी.