कल्याण : अयोध्येतल्या राममंदिराचं उद्या भूमिपूजन होणार असलं, तरी त्यापूर्वीच या मंदिराच्या उभारणीवरून श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या न्यायालयीन लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंदू महासभेनं यानिमित्तानं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.



राममंदिराच्या उभारणीचं खरं श्रेय हिंदू महासभेचं असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांचं त्यात काहीही योगदान नसल्याचा आरोप हिंदू महासभेनं केलाय. शिवाय सुरुवातीपासून हिंदू महासभेनं मंदिराची बाजू न्यायालयात लावून धरलेली असताना भाजपने राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा हायजॅक केल्याचा हिंदू महासभेचा आरोप आहे.


ज्यावेळी मंदिराची कमिटी स्थापन करण्याची वेळ आली, त्यावेळी भाजपच्या केंद्रीय कार्यालयात ही समिती बनवली गेली, ज्यातून हिंदू महासभेला डावलण्यात आलं. इतकंच नव्हे, तर हिंदू महासभा मोठी होऊ नये, यासाठीच काँग्रेसच्या इशाऱ्यावरून त्यावेळी जनसंघाची स्थापना करण्यात आली, असा गंभीर आरोप हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद जोशी यांनी केला आहे.


आत्ताही राममंदिराच्या भूमीपूजनापासून हिंदू महासभेला दूर ठेवण्यात आलं असून प्रत्यक्षात आमच्याच हस्ते मंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं होतं, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. राजकीय फायद्यासाठी भाजपनं हिंदू महासभाच नव्हे, तर सावरकरांचाही विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी जोशी यांनी केला.


संबंधित बातम्या :