मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्ष अमृत फडणवीस सरकारने पोलिसांचं कौतुक केलं. पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो.


मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत, असा टोलानी अनिल परब यांनी अमृता फडणवीसांना लगावला.


काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?


अमृता फडणवीस यांनी ट्विटर लिहिलं की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. "


वरुण सरदेसाई यांचा अमृता फडणवीसांवर निशाणा


दरम्यान युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. "मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर," असं त्यांनी लिहिलं आहे.