मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच शाळेला सुट्टी देता यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे.


26 व 27 जुलैदरम्यान बदलापूर-कर्जत या भागात संततधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. दहावीचे काही विद्यार्थी विज्ञान भाग 2, इतिहास, समाजशास्त्र या विषयांची परीक्षा देऊ शकले नाहीत. तर 12 वीचे अनेक विद्यार्थी समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी काही विषयांच्या परीक्षांना बसू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांतील परीक्षेचे पेपर पुन्हा घेण्याचे निर्देश आशिष शेलार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

दरम्यान, ही बाब लक्षात घेऊन यापुढे अशा आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असल्यास शाळा अंतर्गत फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. तसेच बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील, असा निर्णयही घेण्यात आला आहे.

जारी झालेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यात माहे जून, जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर या कालवधीमध्ये बऱ्याचदा संततधार पाऊस, सखल भागांमध्ये पाणी साचणे, पावसाच्या पाण्यामुळे जमीन खचणे असे प्रकार घडत असतात. अनेक ठिकाणी धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीच्या प्रवाहातील पाण्याची पातळी वाढते, अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण होणे, नद्या-ओढे भरुन वाहणे यामुळे अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नाहीत. विद्यार्थी आणि शाळेच्या शिक्षकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो.

आपत्तीच्या पूर्वसुचनेवरुन, हवामान खात्याच्या अंदाजावरुन तसेच त्या-त्या भागातील स्थानिक परीस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्यासाठी अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाईल. त्या दिवशी शाळेमध्ये परीक्षा सुरु/आयोजित असल्यास, शाळा स्तरावरील परीक्षांचे पुनर्नियोजन करुन पुनर्परीक्षा घेण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना राहतील.

महाराष्ट्र राहय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षा सुरु/आयोजित असल्यास, जिल्हाधिकाऱ्यांचे सुट्टीचे आदेश विचारात घेऊन परीक्षांसंदर्भात पुनर्परीक्षा घेण्याचे अधिकार अनुक्रमे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील.