ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात पोलीस आणि राज्य राखीव बल (एसआरपीएफ) तैनात करूनही नागरिकांची वर्दळ कमी होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळं वागळे (झोन-1)आणि कळवा- मुंब्रा (झोन-5) परिमंडळात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात येणार आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 120 जवानांना दोन गटात विभागून कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.


ठाणे शहरात कोरोनाचा कहर वाढत असूनही नागरिक गंभीरतेने घेताना दिसत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे मनपा प्रशासनाने 600 कोविड योद्धांची नेमणूक केली आहे. तर,गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ कोरोना विरोधात पोलीसही रस्त्यावर लढत असल्याने पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा पडला आहे. शहरात संचारबंदीचे आदेश धाब्यावर बसवले जाऊ लागल्याने एप्रिलच्या अखेरीस कळवा- मुंब्रा येथे राज्य राखील पोलिस बलाची 100 जणांची तुकडी (एसआरपीएफ) तैनात करण्यात आली. तरीही, नागरिक नियम पाळत नसल्याचे समोर आले होते.

शहरातील विशेषतः वागळे, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा - दिवा येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. तेव्हा,पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर सरकारकडून प्रत्येकी 60 जवानांची रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी वागळे इस्टेट परिमंडळ - 5 आणि कळवा-मुंब्रा परिमंडळ -1 मध्ये तैनात करण्यात येणार आहे.

राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे मनपा क्षेत्रात कालपर्यंत 2739 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 38 जणांनी आपला जीव गमावला आहे.