मुंबई: शिवसेनेनं मुंबईतल्या जमिनी बिल्डर आणि उद्योगपतींच्या घशात घातल्या. पण बाळासाहेबांच्या स्मारकासाठी यांना एकही जागा मिळत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या दादरमधील सभेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला. शिवाय सभेसाठी शिवसेनेनं केलेल्या आडवणुकीचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला.


महापौर बंगला हडपण्याचा डाव

राज ठाकरे म्हणाले की, ''केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि महापालिकेत शिवसेना सत्तेत आहे. पण त्यांना बाळासाहेंबाच्या स्मारकासाठी जागा मिळत नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची निवड करुन तो बंगला हडपण्याचा डाव आहे.'' असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच मनसे हा देशातील एकमेव पक्ष आहे, जो केलेली कामं जाहीरणे लोकांसमोर मांडून मतं मागतो, असंही सांगायला ते यावेळी विसरले नाहीत.

शिवसेनेला टोला

शिवसेनेने मैदानाच्या बाबतीत केलेल्या अडवणुकीचाही राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, ''शिवसेनेनं मैदानाच्या बाबतीत आडवणूक केली. पण म्हणून आम्ही सभा घेणं थांबवतो का? मनसेची सभा म्हणल्यावर कुठेही गर्दी होणारच'', असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शी

याशिवाय त्यांनी यावेळी आजच्या भाजपच्या पुण्यातल्या सभेवरुनही मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. मुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे गर्दी दिसली नाही, आणि त्यांना न बोलता परत जावं लागलं. शिवाय मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरुन टीका करताना, नोटबंदी फक्त सामान्यांकरता होती. बाकी भाजपाकडे नोटा आहेत, त्या देशभर फिरत आहेत. असं ते म्हणाले.

शिवसेना भाजपचं हिंदुत्व केवळ बोलण्याकरता

शिवसेना-भाजप युतीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''अमित शहा म्हणाले की आमची आणि शिवसेनेची फ्रेंडली मॅच सुरु आहे. पण ही कसली फ्रेंडली मॅच ज्यात एकमेकांबद्दल वाट्टेल ते बोलतात?'' असा सवालही उपस्थित केला. तसेच शिवसेना-भाजपचं हिंदुत्व हे केवळ बोलण्याकरता असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

25 वर्षात तेच विषय

मुंबईतल्या समस्यांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''गेली 25 वर्ष आपण रस्ते, पाणी अशा त्याच मुद्द्यांवर बोलतोय. एक एक पिढी वाया जात आहे आणि शहरं बकाल होत चालली आहेत. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्येही परप्रांतातून लोकं येत आहे, तुमच्याकरताच्या सुविधा वापरत आहेत. नोकरी भरतीत त्यांना प्राधान्य, कंत्राटदारपण बाहेरचेच आहेत.'' असं सांगून परप्रांतीयांवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्सची स्थिती वाईट आहे, केईम हॉस्पिटलमध्ये तर आयसीयू पण नाही. हे गेल्या २५ वर्षांत तुम्ही केलं?'' असा सवाल त्यांनी शिवसेनेला विचारला.

तसेच नाशिकमध्ये जे करुन दाखवलं, तसंच मुंबईमध्ये करुन दाखवण्यासाठी मनसेला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.