मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागणीनुसार सरकारने अध्यादेश काढून तो मराठा समाजाच्या (Maratha Reservation) हाती सुपूर्द केलाय. यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. तसेच राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया यावर उमटल्या. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. यावेळी राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन केलच पण त्यांना एक सल्लाही दिला असल्याचं म्हटलं जातंय. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 


राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. पण तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर थेट वार केला. 


राज ठाकरे यांची प्रतिक्रिया 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी म्हटलं की, 'मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल  ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !'






आंदोलन स्थगित करतोय संपवलं नाही - मनोज जरांगे


मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि सरकारने काढलेल्या महत्त्वाच्या जीआरनंतर मनोज जरांगे  यांनी आपलं आंदोलन संपवले असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, असे असतानाच मनोज जरांगे यांनी एक मोठं वक्तव्य करत पुन्हा सरकारची चिंता वाढवली आहे. मराठा आंदोलन संपवत नसून त्याला स्थगिती देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.


मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?


- नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
- शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. 
- कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
-  जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
- आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
- आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
- SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
- वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
- रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.


ही बातमी वाचा :


आंदोलन संपवलं नाही, स्थगित करतोय; अखेर मनोज जरांगेंनी सरकारला 'खुटी' मारलीच