मुंबई : वाढत्या विरोधानंतर ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यानंतर, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर पक्षाची अधिकृत भूमिका असलेलं पत्र पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. "माझ्या पक्षातील एका सहकाऱ्याने नयनतारा सहगल यांना विरोध केला तरी मनसेचा अध्यक्ष या नात्याने माझा अजिबात विरोध नाही. शिवाय माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे संमेलनाच्या आयोजकांना जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी एक मराठी भाषाप्रेमी दिलगिरी व्यक्त करतो," असंही राज ठाकरे म्हणाले.


"नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, तसंच ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील त्या एक वाहक होणार असतील तर मला किंवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारण नाही. पक्षाचे नेते-प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी हीच भूमिका स्पष्ट शब्दात मांडली होती. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरुर यावं, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो," असं राज ठाकरे यांनी या पत्रात लिहिलं आहे.

तसंच मनसैनिकांनी यापुढे अशा संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, असा दमही त्यांनी भरला आहे.


आयोजकांकडून निमंत्रण रद्द
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीच लेखिका नयनतारा सहगल यांना पत्र लिहून सांगितलं. संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली. त्यानंतर साहित्य वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावाला मनसेसह शेतकरी न्याय हक्क समितीने विरोध केला होता. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका बदलली.

नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद

नयनतारा सहगल यांची प्रतिक्रिया


मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी घेतलेल्या निर्णयावर नयनतार सहगल यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीचे वाद समोर येत होते त्या पार्श्वभूमीवर जावं की नाही याचा विचार मी करत होते. मात्र मी यावं असा आयोजकांचा आग्रह होता. मात्र आयोजकांनी स्वत:च निर्णय घेत मला येऊ नका असं पत्राने कळवलं आहे, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

मी माझं भाषण आधीच आयोजकांना पाठवलं होतं. मुख्यमंत्री माझ्याच व्यासपीठावर असणार आहेत हे मला माहीत नव्हतं. भाजपशासित राज्य आहे, त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना माझं भाषण आवडलं नसेल. माझ्या शब्दांमध्ये जरुर काही त्यांना घाबरवणारं असावं, असा अंदाज सहगल यांनी व्यक्त केला.

मी साहित्यिकांना आता देशात काय चाललंय, स्थिती का बिघडत चालली आहे, द्वेषाचं वातावरण का पसरवलं जातं आहे, हे हिंदू राष्ट्र आहे असं का सांगितलं जात आहे याबद्दल मी सांगणार होते, असं सहगल यांनी सांगितलं. कदाचित हे सगळं बोलणं आपल्या व्यासपीठावरुन ऐकणं मुख्यमंत्र्यांना सहन झालं नसतं, असंही सहगल म्हणाल्या

आयोजकांना वाईट परिस्थितीमध्ये हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे मी समजू शकते. यापुढेही मी महाराष्ट्रात येईल अशी मला आशा आहे. एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने यायला आवडेल, अशी इच्छाही सहगल यांनी व्यक्त केली.

मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण

कोण आहेत नयनतारा सहगल?

लेखिका नयनतारा सहगल या देशात 'पुरस्कार वापसी'ची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत. मात्र नंतर नयनतारा सहगल यांच्यासह 10 दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्वीकारत असल्याचं सहगल यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.

नयनतारा सहगल यांना त्यांच्या ‘रिच लाईक अस’ (Rich Like Us) या पुस्तकासाठी राजीव गांधीच्या कार्यकाळात म्हणजे 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. मात्र दिल्लीनजीक दादरी गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून बिसारा गावातील काही हिंदू तरुणांनी मोहम्मद अखलाख नावाच्या इसमाला ठार मारलं, म्हणून नयानतारा यांनी हा पुरस्कार परत केला होता.

नयनतारा सहगल यांचं निमंत्रण साहित्य संमेलन आयोजकांकडून रद्द