मुंबई : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह उपनगरात आज सकाळपासूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. दादर, परळसह दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. याशिवाय मुंबईच्या विविध भागात संततधार कायम आहे.


 

अंधेरी आणि सायनमध्ये अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे.

 

पश्चिम उपनगरांमधे पावसाची रिमझिम सुरू आहे. त्याचा परिणा उपनगरीय वाहतुकीवर झाला आहे.

 

पूर्व उपनगरांमधेही मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरा धावत आहेत.

 

नवी मुंबईमधे रात्रभर थांबून-थांबून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईकडून सीएसटीकडे येणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे.

 

मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात कालपासूनच वरुणराजाची कृपा कायम आहे. येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस सुरुच राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

ठाण्यासह उपनगर, रायगड, रोहा परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

 

वसईत रात्रभर पाऊस कोसळतोय. वसई विरार क्षेत्रात गेल्या १२ तासात २०७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. नालासोपारातल्या अनेक भागात पाणी साचलं आहे. तर वसईतला सन सिटी रोड पाण्याखाली गेला आहे.

 

 पिंपरी चिंचवडमध्ये धरण क्षेत्रात पाऊस

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चोवीस तासात 55 मिलिमीटर इतका पाऊस झाला. यंदाचा हा सर्वाधिक पाऊस आहे. एक जूनपासून इथं 191 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

 

गेल्यावर्षी 491 मिलिमीटर पाऊस पडला होता तर 39.40 टक्के पाणी साठा शिल्लक होता. यंदा फक्त 10.34 टक्केच पाणी शिल्लक आहे.