सैराट सरकारचं झिंगाट राजकारण सुरू आहे: राधाकृष्ण विखे-पाटील
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2016 03:29 AM (IST)
मुंबई: 'सैराट सरकारचं झिंगाट राजकारण सुरू असून, जनतेला याडं लागण्याची वेळ आली आहे.' अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला हाणला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विखे पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपच्या काळात गुन्हे, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याची टीकाही विखे पाटलांनी केली. दरम्यान विखे पाटलांच्या सैराट टीकेला मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच शब्दात उत्तर दिलं. 'विरोधकांनी आता सैराटमधून बाहेर यावं. आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सज्ज आहोत.' असं मुख्यमंत्री म्हणाले. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे.