मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात ऐतिहासिक दिरंगाई करणारे कुलगुरू संजय देशमुखांवर आता राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. संजय देशमुखांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा प्रश्न वाऱ्यावर सोडून संजय देशमुख अचानक रजेवर गेले. रविवारी देशमुखांनी राज्यपाल कार्यालयाशी संपर्क साधून पुन्हा सेवेत रुजू होण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र देशमुख यांना राज्यपालांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला.

निकालाच्या घोळाची सविस्तर चौकशी होणार असून, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूच्या नावासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे संजय देशमुख यांची लवकरच हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान विद्यापीठाच्या या अक्षम्य चुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची नुकतीच बैठक पार पडली. राजभवनावर झालेल्या बैठकीत राज्यपालांनी विद्यापीठाच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच उरलेल्या 11 हजार 981 विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने लावण्याचे आदेशही राज्यपालांनी दिले.

संबंधित बातमी : ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला सक्त ताकीद